तुला कळतंय ना .......!!







प्रिय............
     तुझ्याशी खुप खुप बोलायचे असते म्हणून मोबाईल आॅन करते.  व्हैट्सएपवर येऊन उगीच स्क्रिन स्क्रोल करीत असतांना तुझ्या नावासमोर येऊन क्षणभर थबकते .... तुझ्या नावाला हलकेच स्पर्श करून अंतरंगात डोकावते आणि नेमका तेव्हा तुही तिथे थांबलेला दिसतोस........

     ह्रदयात धडधड होऊन तुला पहात रहाते ... तुझ्या आॅनलाईन सिग्नलला न्याहाळत ..... तुला हेलो .... करून बोलवावं का असा मनात विचार करत असतानाच तू क्षणात आॅफलाईन नजरेआड होतोस ........!  आॅफलाईनची ती रिकामी पोकळी पाहून हिरमुसली होऊन स्वत:ला निमुटपणे आत ओढून घेते.....!  तरारून फुलायला आलेले शब्द न शब्द फुरगंटून स्वत:ला मिटून घेतात,  डोळ्यांच्या काठावर आलेलं पाणी ..... तसंच तरळत रहातं..... आधाराशिवाय...! 

     असा कसा तू ....?  मला न पहाताच न भेटताच ..... न बोलताच कसा  निघून गेलास.....?   किती नाही म्हटलं तरी थोडासा राग..... थोडासा रूसवा..... थोडीशी बेफीकीरी मनात उमटतेच....!  एकमेकांविषयी अजिबात गैरसमज करून घ्यायचे नाहीत असं ठरवलेलं असतेच आपण .... आणि आतापर्यंत ते कटाक्षाने पाळतोही आपण ... तू नेहमीच ठाम ... निश्चिंत.....!  पण कधी  हे असं होतंच माझं.....!  ज्याची त्याची स्पेस, ज्याचं त्याचं आयुष्य आहे हा डंका कितीही  पिटला तरी मनात थोडीशी बैचनी येतेच ! आणि तुझ्या माझ्या प्रेमातला थोडासा रस उणावतो, उत्कटून, समरसून तुला भेटण्याची आस सपाट पातळीवर येते...!

     आपलं नक्की नातं तरी काय?  या भाबड्या आणि भावूक प्रश्नांपलिकडलं आपलं प्रेम आहे हे ठाऊक असूनही मनात एक छोटसं वादळ घोंगावून जातेच......!( यावर तू आता मिश्कील हसला असशील..)  तेच हसू काहीवेळानं माझ्या ओठांवरही येतं ... जेव्हा तुझे  ते आश्वासक.... निर्मळ..... शांत ..... समजुतदार डोळे आठवतात,  आठवतो  जवळ नसतानाचा तुझा-माझा  नि:शब्दात जपलेला विरह....!   आणि त्या विरहात आपण दोघांनी श्वास-नि:श्वासात गुंफलेले अतूट ऋनानुबंध दिसतात.....अनं तिथेच शांतपणे विरून जाते मनातले क्षणभरचे हे वादळ.... !

      आणि मी आश्वस्थ होते ...... पुन्हा नव्याने अधिकच तुझ्या प्रेमात पडते .....!!
तुला कळतंय ना .......!!


@ समिधा

    

स्री पुरूष मैत्री एक दिवास्वप्न !

  

 

       अहो ..... तुम्ही आरशात पहा जरा स्वत:ला !   बघा  तरी कसा अवतार झालाय ? पोटाचा घेर वाढलाय, चेहरा केवढा ओढल्यासारखा दिसतोय ! स्वत:कडे लक्ष द्या नं जरा.  किती काम आणि काम करीत रहाल?  कीती वेळा तुम्हाला हे सांगितलं पण तुम्ही  माझं कशाला एेकाल... तुम्हाला एखादी मैत्रीण असती तर बरे झाले असते .... निदान तिचे तरी एेकलं असतं.! असं मी माझ्या प्रिय नव-याला बोलते .... तेव्हा त्यांच्या चेह-यावर मिश्कील हसू तरळतं...! हे मी माझ्या पतीला एवढ्या सहज बोलू शकते तितक्या सहज मी त्याची मैत्रीण खरंच स्वीकारेन का?
     मी एक स्त्री  आहे  आजची आधुनिक पुरोगामी  विचारांची  … तरीही माझ्या विचारांना पारंपरिक संस्कारांची एक बैठक आहे ! पुरोगामी विचारांच्या तळाशी अभेद्य अश्या परंपरेची घट्ट वीण आहे तिची गाठ माझ्या दैनंदिन व्यवहारपासून ते एकूण  जीवन मूल्यांपर्यंत वेढली आहे !  अश्या ह्या समांतर रेषेतील जगण्यात मी माझे स्त्रीत्वाचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करते  …  तेंव्हा माझा स्वत:शीच मानसिक संघर्ष खुप होतो.
     मग हा संघर्ष होत असतांना आपल्या मनातील प्रत्येक विचाराला नैतीक अधिष्ठान असतेच असे नाही. कारण हा संघर्ष खरंतर  मन आणि बुद्धी यांच्यात होत असतो.  
     जेव्हा  हा  पुरोगामी आणि पारंपारीकतेचा संघर्ष स्री-पुरूष नातेसंबंध असा माझ्या आत होत असतो तेव्हाच्या विचारसंक्रमणात  आपण आपल्या काही नितीमुल्यांचा पुन्हा एकदा नव्याने आणि अधिक प्रगल्भतेने विचार करावा असे वाटते. तेव्हा वाटते आपले अस्तित्व ज्या परंपरा संस्कार यांच्या पायावर उभे आहे त्यांना पुन्हा एकदा स्री-पुरूष दोघांनीही नव्या दृष्टीकोनातून तपासले पाहिजे आणि काळाप्रमाणे त्यांचा स्विकार करून जगणे अधिक समृद्ध केले पाहिजे ! पण जगणे समृद्ध करणे म्हणजे नेमके काय? सहज, सोपे, सुटसुटीत जगता येणे  या जगण्याला मी समृद्ध मानते.  जिथे प्रत्येक विचारात सुस्पष्टता असते,  गृहितकांना स्पष्ट नकार असतो, आणि प्रत्येक विचारामागे कृतीमागे आयुष्याला अधिक अर्थपुर्ण करण्याची आस असते, एवढेच नाही तर त्या नात्यामुळे आपल्या जगण्याला उर्जीत चालना मिळणे अपेक्षीत असते.

     प्रत्येक नात्यामध्ये ज्याची त्याची स्वतंत्र जागा असावी.  पण ही जागा कोणत्याही नात्याच्या दृढतेला विश्वासाला धक्का देणारी नसावी.  नात्यांमधील आस्था , प्रेम हे कृत्रीम न रहाता ते अधिक सकस आणि सजीव व्हायला पाहिजे.   प्रत्येकाचे एक  स्वतंत्र भावविश्व असते. त्या भावविश्वात आपल्या भोवती , आपल्या सोबत असणा-या प्रत्येक व्यक्तिचा प्रवेश होत नाही ! एखादाच तिथे पोहचतो जो आपल्या आंतरिक संवेदनांना विचारांना समजू शकतो हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य  स्री-पुरूष दोघांनाही उदारतेने सन्मानाने स्वीकारता आले पाहिजे.

     जेव्हा स्री-पुरूष संबंध हा केवळ शारीरपातळीवरून जोखला जातो तेव्हा त्या नात्याला आपसुकच एक दुर्गंधी येते! खरं तर  या नात्याला अनेक कंगोरे आहेत.  जेव्हा एक प्रगल्भ स्री आणि एक प्रगल्भ पुरूष यांच्यात मैत्री होते ती परिस्थितीच्या अधीन असते तरिही वास्तवाचे भान ठेवणारी आणि एकमेकांच्या स्वतंत्र संसारांचा आदर राखून एकमेकांच्या  सानिध्यात संपर्कात येऊनही परस्परांच्या आत्मीक उन्नती आणि प्रगतीसाठी प्रयत्नशील असते.. ! अशी मैत्री कुणालाही दिवास्वप्नच वाटेल पण अगदी रविंद्रनाथ टागोर, बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, गाोपाळकृष्ण गोखले, सरोजीनी नायडू यांनी अनुभवलेली स्रीपुरूष मैत्रीचे सामर्थ्य याच नातेसंबंधांवर आधारीत असलेल्या  अरूणा ढेरे यांच्या प्रेमातून प्रेमाकडे हे पुस्तकातून वाचायला अनुभवायला मिळते .  अगदी अलिकडचे जी. ए. कुलकर्णी सुनिता देशपांडे, एमरोज अमृता प्रितम साहिर लुधयानवी   या महान विभुतींची उदाहरणे पाहिली की स्री पुरूष मैत्रीचा एक  सुंदर आयाम आपल्याला समजतो.
ही अशी मैत्री दोघांचाही सन्मान, आदर  वाढवणारी आणि समाजात अभिमानाने मिरवता येणारी पाहिजे .

     या संपुर्ण विचार संक्रमणात एकूणच  स्री - पुरूष नाते मग ते पती पत्नीचे असो वा अन्य कोणतेही  प्रत्येक नात्यात एक खरा सच्चेपणा पाहिजे  !  त्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास तर हवाच पण प्रत्येक नात्याला त्याचे एक विशीष्ट स्थान असते ते स्थान अबाधीत ठेवून त्याचा योग्य तो सन्मान करणे  आवश्यक आहे.

      थोडक्यात एक अस्तित्व दुस-या अस्तित्वाशी जोडले जाते ते त्यामधील समसंवेदनांमुळेच त्या जितक्या
 ख-या स्वच्छ, निर्मळ तितकेच ते नाते पवित्र असे माझे प्रामाणिक मत आहे.  !

@  समिधा
    

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......